कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटणारे तीन जण अटक

कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या हातामधील, पिशवीतील किमती ऐवज चोरुन नेणाऱ्या तीन जणांना कल्याण लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सोमवारी शिताफीने अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल, हातामधील पैशाचा बटवा पळून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. या चोरट्यांना पकडण्यासाठी सापळे लावले असून यामध्ये हे तीन चोरटे सापडले.

राजू गायकवाड, मेघा शेख, राजेश अशी आरोपींची नावे आहेत. कल्याण रेल्वे स्थानक सर्वाधिक गर्दीने गजबजलेले रेल्वे स्थानक आहे. लोकल, एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची या ठिकाणी वर्दळ असते. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसने जाणारे अनेक प्रवासी रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकी जवळील मोकळ्या जागेत एक्सप्रेस येईपर्यंत प्रवासी त्यांच्या बॅग ठेवून कुटुंबीयांसह झोपलेले असतात. काही प्रवासी एकटेच असतात. अशा प्रवाशांना हेरुन चोरटे त्यांच्या जवळील मोबाईल, बॅगेमधील पैसे, किमती सोन्याचा ऐवज चोरुन पळ काढतात.

कल्याण रेल्वे स्थानकात तिकीट खिडकी जवळ रात्रीच्या वेळेत झोपलेल्या एका प्रवाशाच्या पिशवीतील किमती ऐवज तिन्ही आरोपींनी चोरुन नेला होता. लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद देशमुख, रेल्वे सुरक्षा बळाचे वरिष्ठ निरीक्षक अनिल उपाध्याय यांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने चोरट्यांचा तपास सुरू केला होता. या कॅमेऱ्यांमध्ये हे चोरटे कैद झाले होते तपास पथकाने सचीन साठे या प्रवाशाचा मोबाईल चोरणारा राजू गायकवाड, मोहम्मद अन्सारी या प्रवाशाची पिशवी चोरणारा राजेश आणि मेराज खान यांचा मोबाईल चोरणाऱ्या मेघा शेख यांना शिताफीने पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत. चोरीचा ऐवज कुठे ठेवला आहे. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *