कल्याणमधील अभिनव विद्या मंदिर शाळेच्या आनंदी गोपाळ सभागृहात या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पार पडले. या उत्सवाची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर साहित्यिकांनी उपस्थिती लावली होती.
माध्यम कोणतेही असू दे भाषा सदृढ व्हावी ती मोडकी तोडकी असू नये. भाषा चांगली असेल तरच वाचनाची आवड वाढेल. नवीन शब्द निर्मिती झाली तरच युवा पिढी वाचनाकडे वळू लागेल असे प्रतिपादन डॉ. विलास पवार यांनी व्यक्त केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ठाणे आणि सार्वजनिक वाचनालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानाने कल्याण पश्चिम येथील आनंदी गोपाळ सभागृह येथे दोन दिवसीय ठाणे ग्रंथ उत्सव 2022 चे आयोजन केले होते. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत ग्रंथ प्रदर्शनाने विक्री करण्यात आली होती. 11 प्रकाशकांची 20 हजाराहूनअधिक पुस्तके येथे उपलब्ध करून दिली. ग्रंथदिंडी ने या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर उद्घाटन झाले.
दुपारच्या सत्रात समाज माध्यमांचे वाचन चळवळीवरील परिणाम या विषयावर परिसंवाद झाला. या कार्यक्रमात अध्यक्ष भाषणात ते बोलत होते यावेळी डॉ.विलास पवार यांच्यासह नितीन केळकर आणि निकिता भागवत यांनी माध्यमांबाबत मते मांडली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील ही उपस्थित होते. समाज माध्यमे आल्यापासून विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वाचनाची पातळी वाढली आहे. माध्यम कोणतेही असले तरी वाचणे महत्त्वाचे आहे. माणसाने वाचायला कुठेही कमी पडू नये. माणसाला वाचले तर सगळे वाचता येईल असे निकिता भागवत म्हणाल्या तर समाज माध्यमांचा विचार करताना त्यांच्यावर किती अवलंबून राहायचे याचा विचार करणे महत्त्वाचे असल्याचे नितीन केळकर यांनी सांगत माध्यम साक्षरता म्हणून हाती घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समूह माध्यमाच्या हातात जाऊ नका त्यांच्या आवश्यक मर्यादा धोके समजून घेणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

