मोरा बंदरातील गाळामुळे जलप्रवासात खोळंबा; प्रवाशांकडून संताप व्यक्त

मोरा ते मुंबई दरम्यानच्या जलसेवेत मोरा बंदरातील गाळाचा अडथळा निर्माण होऊ लागला असून शुक्रवारी सायंकाळी ५.३० नंतर साडेतीन तासांसाठी ही जलसेवा बंद राहणार असल्याचे मोरा बंदर विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे या मार्गावरील मुंबई व मोरा येथून या जा करणारे प्रवासी व चाकरमानी यांच्या प्रवासाचा खोळंबा होत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मागील अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून लाखो क्यूबीक मीटर गाळ काढला जात आहे. मात्र तरीही दरवर्षी मोरा बंदरात गाळाची समास्या कायम आहे. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. मोरा मुंबई हा जलमार्ग महत्वाचा असून उरण ते मुंबई दरम्यानचा हा जलद प्रवासाचा मार्ग म्हणून दररोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने उरणमधून मुंबईत नोकरी निमित्ताने ये-जा करणारे चाकरमानी दररोज प्रवास करीत आहेत. सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेतच समुद्राला ओहटी लागत असल्याने किनाऱ्यावरील गाळात प्रवासी बोट अडकू नये यासाठी मुंबईतील भाऊचा धक्का तसेच मोरा या दोन्ही बंदरातील वाहतूक बंद केली जात आहे.

मोरा बंदरातील गाळ काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र. तोपर्यंत समुद्राच्या ओहटीमुळे सायंकाळी मोरा ते मुंबई ही जलसेवा काही तास बंद करण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदराचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *