गेली दोन वर्षे आपल्याला निर्बंध होते. पण, यावर्षी सर्व सण मुक्त आणि मोकळ्या वातावरणात साजरे करत आहोत. सकारात्मक बदल सगळीकडे पाहायला मिळत आहे. आपल्या सर्वांसाठी हे शिवधनुष्य आम्ही पेललं असून, आमचाही आत्मविश्वास वाढला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं आहे.
दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी दिवाळीच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, शिंदे-भाजपा सरकारमधील कामांची माहिती दिली आहे. “बाळासाहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला प्रधान्य द्यायला, तर आनंद दिघेंनी सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या हक्कासाठी लढायलं शिकवलं. त्यामुळे शेतकरी कष्टकरी, वंचित, शोषित अशा सर्वांच्या विकासाचा आमचा ध्यास आहे. तो पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करत आहोत.”
“आपत्तीने आपण कधीच डगमगलो नसल्याने, काही चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला. त्या यशस्वी होत आहेत, याचं समाधान आहे. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांनी एसटी मोफत सुरु केली. ५२ दिवसांत एक कोटी नागरिकांनी याचा लाभ घेतला. दिवाळीत रेशनकार्ड धारकांसाठी ‘आनंदाचा शिधा’ केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना एनडीआरफच्या मदतीच्या दुप्पट आणि २ ऐवजी ३ हेक्टरमध्ये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे ३० लाख शेतकऱ्यांना ४ हजार कोटींची रुपयांची मदत मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.
“सततच्या पावसामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत केली. भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ९५० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. २० हजार पोलीस शिपायांची पद भरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील विविध विभागांत ७५ हजार पदांची भरती सुरु होणार आहे. पोलिसांच्या घराच्या किंमती ५० लाखांवरून १५ लाखांवर आणल्या. प्रत्येक जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय तर, राज्यात ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करणार आहोत,” अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.
“मुंबईतील एमएमआरडीए प्रकल्पांनी गती देण्यासाठी ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास परवानगी दिली आहे. मुंबईत ३३७ किलोमीटर मेट्रोचं जाळ उभ होत आहे. राज्यातील १५ हजार विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी टाटा इन्टिट्यूट ऑफ सायन्सशी करार केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बक्षीसात ५ पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी, सिंचन, पायभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातील कामांना आम्ही गती देत आहे,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.
