गेल्या दोन वर्षांपासून असलेले करोनाचे संकट काहीसे निवळले असले तरी यंदा स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि दीर्घकाळ चालणाऱ्या सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण राज्यातील अनेक भागांत वाढत आहेत. पावसाळा लांबत चालल्यामुळे तसेच वातावरणातील विचित्र बदलांमुळे देखील हा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यंदा जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राज्यात ३५८५ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला.राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, स्वाइन फ्लूचे राज्यातील सर्वाधिक १२२८ रुग्ण आणि ४६ मृत्यू पुणे जिल्ह्यात आहेत. नागपूरमध्ये ५२४ रुग्ण आणि २८ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. नाशिकमध्ये २४४ रुग्ण आणि १५ मृत्यू, ठाण्यात ५६४ रुग्ण आणि १६ मृत्यू तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये अनुक्रमे ४५ आणि १९२ रुग्ण तसेच १३ आणि १९ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि सणासुदीच्या काळात तसेच सुट्टीनिमित्त बाहेर जाताना खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
