दिवाळीच्या मुहूर्तावर सध्या अनेकदण नवी खरेदी करताना दिसत आहेत. यामध्ये महिला वर्गाची लगबग सुरु ती म्हणजे घरातलं वाणसामान भरण्याची. भाजीपाल्याच्या दरांवर नजर ठेवत साठवणीचा कांदा, लसूण घेण्यासाठीही अनेक गृहिणी बाजाराची वाट धरत आहेत. अपवाद वगळता कांदा जवळपास सर्वच पदार्थांमध्ये वापरला जातो. अनेकजण तर कच्चा कांदा जेवणासोबतच जोडीलाही खातात. पण, आता मात्र हा कांदाच जेवणातून हद्दपार होतो की काय, याचीच भीती व्यक्त केली जात आहे. कारण, ठरतंय ते म्हणजे कांद्याचे वाढणारे दर.
मुंबईत साधारण गेल्या 8 महिन्यांपासून स्थिर असलेल्या कांद्याच्या दराने सणासुदीच्या काळातच उसळी घेतली आहे. मागील आठवड्यापर्यंत 7 ते 10 रुपये किलो असलेल्या कांद्याचे दर आता थेट 15 ते 25 रुपये किलोदरम्यान गेले आहेत. काही ठिकाणी कांदा 30 रुपयांहूनही जास्त किमतीला विकला जात आहे.
