जेवणासाठी आधार कार्ड दाखवा; वधूपित्याची वराच्या पाहुण्यांकडे अचंबित करणारी मागणी

लग्न म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे एक सुंदर मंडप, वधू-वर, सुरु असलेलं संगीत, पाहुण्यांची गर्दी आणि लग्नातलं जेवण. मात्र उत्तरप्रदेशात अशी एक घटना घडली आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला हसू आवरता येणार नाही. अमरोहाच्या आदमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून हसनपूरच्या परिसरात निघालेल्या वरातीत जेवणाच्या वेळी आलेल्या पाहुण्यांची संख्या अंदाजापेक्षा जास्त होती. यावेळी वधूच्या वडिलांनी एक भन्नाट शक्कल लढवली.

वधूच्या कुटुंबाने वराच्या बाजूच्या ज्या लोकांकडे आधारकार्ड आहे, त्यांनाच बँक्वेट हॉलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली. ज्या पाहुण्यांकडे आधार कार्ड नव्हते त्यांना जेवण न जेवताच परतावे लागले. दरम्यान काही व्यक्तींनी या प्रकरणाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

असे सांगितले जात आहे की, २१ सप्टेंबर रोजी हसनपूर येथील एका वस्तीत दोन वेगवेगळ्या वराती आल्या होत्या. यानंतर जेवण सुरू झाल्यावर दोन्ही ठिकाणी वरातीत आलेले पाहुणे जेवणावर तुटून पडले. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. पाहुण्यांची संख्या पाहून मुलीच्या बाजूचे लोक गोंधळले आणि त्यांनी जेवण बंद केले. मग मुलीच्या कुटुंबीयांनी ठरवले की ज्या पाहुण्याकडे ओळखपत्र असेल, त्यांनाच बँक्वेट हॉलमध्ये प्रवेश मिळेल. मात्र यामुळे खऱ्या पाहुण्यांचाही भ्रमनिरास झाला कारण प्रत्येकाकडे आधार कार्ड नव्हते.

लग्नाच्या या कार्यक्रमात बराच गदारोळ झाला, पण समजूतदार लोकांनी दोन्ही बाजूच्या लोकांना समजावून शांत केले. या वरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *