‘लम्पी’मुळे गुरे गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ; ३० हजारांपर्यंत मदतीचा सरकारचा निर्णय

राज्यात लम्पी आजारामुळे गुरे गमावलेल्या शेतकरी आणि पशुपालकांना १६ ते ३० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील सुमारे दीड हजार रीक्त पदे तातडीने तात्पुरत्या  कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. त्यात पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहेत.ओढकाम करणारी जनावरे (बैल) यासाठी प्रति जनावर २५ हजार रुपये तीन जनावरांपर्यंत आणि वासरांसाठी १६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ओढकाम करणाऱ्या तीन लहान जनावरांपर्यंत ही मदत दिली जाईल.

लम्पीमुळे गुरे गमावलेल्या मालकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांनुसार अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

अधिकार, कर्मचाऱ्यांना मानधन किती?

कंत्राटी अधिकाऱ्यांना महिना ५० हजार रुपये ठोक मानधन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षकांना महिना १५ हजार रुपये मानधन देण्यात येईल. केवळ ११ महिन्यांसाठी ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असे पशुसंवर्धन विभागाने आदेशात स्पष्ट केले आहे.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंत्राटी भरती

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयातील सुमारे दीड हजार रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्यानुसार पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २९३ पदांची भरती करण्यात येईल. त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षकांची ११५९ पदे याच पद्धतीने भरली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *