गणेशोत्सव दणक्यात उरकत आता अनेकांनीच घरची वाट धरली आहे. काही दिवसांसाठी गजबजलेलं कोकण आता रिकामं होत असून, चाकरमानी मुंबईच्या दिशेनं रवाना होऊ लागले आहेत. पण, कर्मभूमीत पोहोचण्यासाठीची त्यांची वाट इतकी सोपी नाही.
गौरी गणपती आणि पाच दिवसांचे गणपती उरकल्यानंतर आता गावाचा निरोप घेऊन असंख्य कोकणवासीय खासगी वाहन आणि एसटीनं प्रवास करत मुंबई रोखाने निघाले आहेत. परिणामी रायगड – मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
माणगाव शहर आणि परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. वाहनांच्या या रांगा साधारण 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पोहोचल्या आहेत.
गर्दीत असणाऱ्या वाहनांमध्ये बहुतांश आकडा हा मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचा असल्याचं कळत आहे. लोणेरे, कोलाड, इंदापूर इथंही वाहतूक कोंडी असल्याचं स्पष्ट होत आहे. सदर भागांमध्ये बाजारपेठा असल्या कोंडी वाढण्यास आणखी एक कारण मिळत आहे.
थोडक्यात तुम्हीही खासगी वाहनानं प्रवास करणार असाल आणि कोकणातून मुंबईच्या दिशेनं निघणार असाल, तर सर्वात आधी शक्य असल्यास Google Map चा वापर करत Traffic चा आढावा घ्या. प्रवासाचं पूर्वनियोजन करा, किमान मनस्ताप कमी होईल.
