कामावर जाण्यासाठी निघाली तरुणी; वाटेत टँकरने चिरडल्याने जागीच मृत्यू

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना कल्याण पश्चिमेतील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर आज घडली आहे. कविता म्हात्रे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. कविता म्हात्रे या एका पेट्रोल पंपावर कामाला होत्या. या प्रकरणाचा तपास कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कविता म्हात्रे ही महिला म्हारळ परिसरात राहते. कविता या कल्याण पूर्व परिसरातील टाटा नाका परिसरातील एका पेट्रोप पंपावर कामाला होत्या. आज दुपारी त्या म्हारळ येथील घरातून दुचाकीवरुन कामावर जाण्यासाठी निघाल्या. मात्र मागून येत असलेल्या टॅंकरने कविता यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्या पडल्या आणि टँकरच्या मागच्या चाकाखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुदैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तर या परिसरातील सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *