राज्यात लवकरच 2 हजार 72 प्राध्यापकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिलीय. त्यामुळे ज्ञानदानाचं काम करण्यासाठी इच्छूक तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
राज्यातल्या प्राचार्यांच्या रिक्त जागा आणि 8 हजारांपैकी 2 हजार 72 प्राध्यापकांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौऱ्यावर असताना ही माहिती दिलीय. बऱ्याच वर्षांपासून प्राध्यापक भरती रखडली होती. आता या नव्या भरतीमुळे पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अपात्र शिक्षकांची कोर्टात धाव
टीईटी घोटाळ्यात कारवाई झालेल्या अपात्र शिक्षकांनी कोर्टात धाव घेतलीय. राज्यातील 7 हजार 880 शिक्षकांवर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
घोटाळ्यात आरोप झालेल्या शिक्षकांचे वेतन थांबवल्याने हिंगोलीतील तीन शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतलीय. संबंधित याचिकेवर 20 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आलीय. त्यामुळे या सुनावणीत काय निर्णय घेण्यात येणार, याकडे अपात्र शिक्षकांचं लक्ष असणार आहे.
