सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचीच धूम पाहायला मिळत आहे. गल्लीबोळातही गणपती बाप्पाचे सूर निनादू लागले आहेत. गणेशोत्सव म्हटलं, की मुंबई आणि त्यातही मुंबईच्या (Mumbai) काही भागांमध्ये असणारा उत्साह काही औरच. पण, सध्या मुंबईतला गणेशोत्सव त्याला मिळालेल्या राजकीय किनारीमुळंही चर्चेत आला आहे.
वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा हक्काचा गड मानला जातो. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्याकडे या मतदारसंघाच्या प्रतिनिधीत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. पण, त्यांच्याच मतदार संघात आता त्यांना मोठा धक्का मिळाला आहे.
कारण ठरत आहे ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ग्रँड एन्ट्री घेतली आहे. ठाकरेंच्या हक्काच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स झळकले आहेत.
वरळीचा लाडका मार्केटचा राजा इथं श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे पोस्टर लावण्यात आले आहेत. कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो आहेत त्यामुळे आता वरळीत शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकिकडे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही शिंदे गट खिंडार पाडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर मुख्यमंत्री पैसे देऊन वरळीत बॅनर लावून घेत असल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केला आहे. तर आमचं सरकार गोरगरीबाचं आहे त्यामुळे लोकांचं प्रेम दिसून येतंय असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं आहे.
सत्तांतरानंतर संपूर्ण चित्र बदललं…
महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतराचं वळण आल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं. शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त १५ आमदार राहिले. यातील आणखी काही आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा करण्यात येत आहे. तेव्हा आता राज्यातील या राजकीय घडामोडींकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
