पर्लकोटा नदीला पूर, २३४५ लोकांना हलविले, शाळा २० जुलै पर्यंत बंद

मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड, हेमलकसा येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गडचिरोलीत पूर कायम असल्याने २३४५ लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

जिल्ह्यात १० जुलैपासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांमधून पाणी वाहत आहे. आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने बुधवार २० जुलै पर्यंत जिल्हा प्रशासनाने आत्यावश्यक सेवा वगळता शाळा व इतर आस्थापना बंद राहणार याबाबत आदेश निर्गमित केले आहे.

दरम्यान, भामरागड परिसरात मुसळधारेने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, वेनगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहे. १८ ते २० जुलै या कालावधीत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. नागपूर वेध शाळेने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने सदर आदेशाला जिल्हाधिकारी संजय मीना यांनी बुधवार २० जुलैच्या मध्यरात्री पर्यंत वाढ केली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणेसह सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ११ जुलै पासून शाळा व इतर आस्थापना बंदच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *