विद्यार्थ्यांना मिळणार पावसाची सुटी, शिक्षण विभागाच्या मुख्याध्यापकांना सूचना

शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिस्थिती पाहून शाळांना सुटी  देण्याची सूचना महापालिका शिक्षण विभागामार्फत शहरातील शाळांना देण्यात आली आहे. मुख्याध्यापकांनी आपापल्या पातळीवर हा निर्णय घ्यावा, असे महापालिकेच्या शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांनी कळविले आहे

प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक आपापल्या अधिकारामध्ये काही सुट्या शाळेला देऊ शकतात. त्यानुसार या सुट्या देऊन शालेय कामकाज व अभ्यास नंतर भरून काढण्याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाने कळविले आहे. पावसाची परिस्थिती पाहून शाळांना निर्णय घ्यावा लागणार आहे. पावसाळी परिस्थितीमुळे दिलेल्या सुट्यांच्या कालावधीतील शालेय कामकाज तसेच अभ्यास या शाळांना नंतर भरून काढावा लागणार आहे.
आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी सूचना

महापालिका शिक्षण विभागाने दिलेली सूचना पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी लागू आहे. परंतु, शहरातील अनेक पूर्वप्राथमिक शाळांनी नर्सरी ते सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी सुटी दिली होती. या शाळांनी पालकांना सोमवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान मेसेजद्वारे शाळेला सुटी असल्याची माहिती दिली. अनेक शाळांनी सोमवारी शाळा संपल्यानंतर मंगळवारी शाळेला सुटी असल्याचा निरोप पालकांना दिला.

सध्याची पाऊस परिस्थिती लक्षात घेऊन, महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करून त्यानंतरच शाळांना सुटी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शाळेने सुटी दिल्यास कोणतीही विचारणा केली जाणार आहे. परंतु, या कालावधीतील शालेय कामकाज व अभ्यास मात्र भरून काढणे बंधनकारक असल्याचे महापालिका शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी सुनिता धनगर म्हटले.

जिल्ह्याच्या ग्रामीणच भागातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊन सुरू आहे. इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगणा, कळवण या भागात अनेकदा पावसामुळे मोठे नुकसान होते. ग्रामीण भागात सुविधाही अपुऱ्या असतात. त्यामुळे त्यानुसार शाळांना सुटी देण्याची सूचना देण्यात आल्याची प्रतिक्रिया जि. प. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *