देशभरात उद्यापासून प्लास्टिक बंदी

केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालयाच्या निर्णयानुसार उद्यापासून (१ जुलै) पुण्यातही प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आता वापरता येणार नाहीत. राज्यात सरकारने पाच वर्षांपूर्वींच प्लास्टिक बंदी लागू केली असल्याने नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.

 पर्यावरणीय समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शाश्वत पर्याय म्हणून केंद्र सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. जाहीर केलेल्या नियमांची उद्यापासून संपूर्ण राज्यात अंमलबजावणी होणार आहे. यात प्रामुख्याने शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि वस्तूंवर बंदी आहे. कॅरीबॅग, वस्तूंच्या सुरक्षेसाठी केले जाणारे प्लास्टिक वेष्टण, प्लास्टिकच्या पिशव्या, डिश, ग्लास, थर्माकॉलचा वापर करता येणार नाही. दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा बंदीमागचा मुख्य उद्देश आहे.

शहरे, ग्रामीण भागात दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय असून, यातील ७० टक्के कचऱ्याचे विघटन व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. बहुतांश ठिकाणी हा कचरा कचराडेपो, जलाशयांमध्ये फेकला जातो. अनेक गावांमध्ये, मोठ्या शहरातील उपनगरांमध्ये पुनर्प्रक्रिया शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी हा कचरा थेट जाळतात. वेगवेगळ्या घटनांमध्ये भटक्या जनावरांच्या पोटातही प्लास्टिक पिशव्या सापडल्या आहेत. विघटनास घातक ठरणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचे आक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. एकीकडे प्लास्टिक बंदीची कारवाई सुरू असतानाच प्रशासन प्लास्टिकला पर्याय शोधणाऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे.
राज्यात थंडावलेली मोहीम होणार सक्रिय

राज्य सरकारने २०१६मध्ये प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढील तीन वर्षांत प्लास्टिक वापर रोखण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादक कारखाने, विक्रेते, वापरकर्ते आणि ग्राहकांवरही दंडात्मक कारवाया केल्या. त्यामुळे प्रामुख्याने मुख्य शहरांमध्ये कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर वाढला होता. भाजीवाल्यांकडेही प्लास्टिकच्या पिशव्या दिसेनाशा झाल्या. मात्र, करोना काळात प्लास्टिकला पर्याय उपलब्ध नसल्याने प्रशासनाला ही मोहीम शिथिल करावी लागली. राज्यात दोन वर्षे थंडावलेली ही आता सक्रिय होते आहे. नियमबाह्य प्लास्टिकच्या वस्तू वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महापालिकेने घेतला आहे.

राज्यामध्ये पाच वर्षांपूर्वीच प्लास्टिक बंदी जाहीर झाली. प्रशासनाने सातत्याने केलेल्या कारवायांमुळे राज्यात आता प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन होत नाही; तसेच प्लास्टिकचा वापरही कमी झाला आहे. केंद्र सरकारच्या आदेशांनुसार उद्यापासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक व्यापक करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

– नितीन शिंदे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ

नियमांचा भंग केल्यास होणारा दंड

पहिली कारवाई – पाच हजार रुपये दंड

दुसरी कारवाई – दहा हजार रुपये दंड

तिसऱ्या वेळेस – पंचवीस हजार दंड, तीन महिने कारावास

पुण्यातील कचऱ्याची सद्यस्थिती

१९०० टन – दररोज तयार होणारा कचरा

७७० टन – ओला कचरा

११११ टन – प्लास्टिक व्यतिरिक्त कोरडा कचरा

 ९२ टन – प्लास्टिक कचरा

१६ टन – घरगुती घातक कचरा

४५४ ग्रॅम – प्रति व्यक्ती तयार होणारा कचरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *