शहरातील कुर्ला येथे काल रात्री चार मजली इमारत कोसळल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याने बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, या दुर्घटनेत तिघांचा आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जणांना वाचवण्यात आले आहे.
कुर्ला पूर्वेकडील एसटी बस डेपोच्या जवळील नाईक नगर सोसायटीयेथील चार मजली इमारत सोमवारी रात्री कोसळली. यावेळी इमारतीत 20 ते 25 रहिवाशी राहत होते. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली सगळे लोक अडकले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 12 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप बचावकार्य अद्याप सुरू आहे.
दरम्यान, जखमींना उपचारांसाठी राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजावाडी रुग्णालयात दहा जणांना दाखल केले होते. त्यातील नऊ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे.
या दुर्घटनेबद्दल शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, असे म्हटले आहे. आताच 12 तासानंतर एकाला जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. याच विषयी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार आहे. मृतांना 5 लाखाची मदत शासना तर्फे जाहीर करण्यात आली आहे. जखमींवर मोफत उपचार शासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. या दुर्घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.
