शहरात सोमवारपासून (27 जून) 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.दमदार पावसाअभावी जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महानगरपालिका प्रशासनाचा हा निर्णय घेतलाय. त्यामुळे सर्व नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन करण्यात आलय. पालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यातही 10 टक्के कपात लागू राहणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत ही पाणी कपात असणार आहे.
यंदाचा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे 70 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयामधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका असावा लागतो.
त्या तुलनेत आज या सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त 1 लाख 41 हजार 387 दशलक्ष लिटर म्हणजे 9.77 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्याच दिवशी हा जलसाठा 15.54 टक्के इतका होता.
