बंडखोरी केलेले शिवसेना आमदार आणि अपक्ष यांचं पोलीस संरक्षण राज्य सरकारने काढून घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमवीर आता राज्य सरकारकडून त्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच ट्विटरवरून यासंदर्भात खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस विभागाला पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून ३८ आमदारांची यादी असलेलं पत्र शेअर केलं आहे. हे पत्र त्यांनी गृहमंत्री आणि पोलीस विभागाला पाठवलं असून या पत्रामध्ये आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. “मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे”, असं आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
