विदर्भात पावसाची जोरदार हजेरी; वीज पडून दोघांचा मृत्यू

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असताना विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम आणि वर्धा जिल्ह्यात शनिवारी मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. दरम्यान, वीजा पडून भंडारा आणि वाशीम जिल्ह्यात प्रत्येकी एका गुराख्याचा मृत्यू झाला. तर विदर्भात एकूण १२ शेळ्या ठार झाल्या.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील शिवनी येथे शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वीज पडल्याने पिसाराम अंताराम चचाने (वय ५५) यांचा मृत्यू झाला. तर हिमांशी राजेश नेवारे (वय १०) आणि क्रांतिवीर सुभाष गरपडे (वय १५) हे दोघे जखमी झाले. हे तिघेही शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गिव्हा कुटे येथील नारायण वासुदेव व्यवहारे (वय १७) हा शेळ्या चारण्यासाठी गेला असताना पाऊस सुरू झाला. यावेळी वीज कोसळून नारायण याच्यासह सात शेळ्यासुद्धा जागीच ठार झाल्या. वर्धा जिल्ह्यातील झाडगाव येथील पुरुषोत्तम भुतकर हे शनिवारी सायंकाळी जंगलातून बकऱ्या घेऊन घरी परत येत असताना वीज पडल्याने त्यांच्या पाच बकऱ्या ठार झाल्या.

उष्माघाताने दोघांचा मृत्यू

भंडारा : तुमसर तालुक्यातील सुंदरटोला येथे उष्माघातामुहे दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गयावंती शेंडे (वय ५०) आणि कमल परतेती (वय ५५) अशी मृतकांची नावे आहेत. हे दोघेही काही वर्षांपासून एकत्र सुंदरटोला येथे राहत होते. मोलमजुरी व सरपण विकून आपला उदरनिर्वाह करीत होते. मागील काही काळात उन्हाची तीव्रता वाढली असताना त्या दोघांनाही अन्न आणि पाणी मिळाले नव्हते. त्यातच घरात पंखा नसल्याने त्यांना उष्णतेचा त्रास सुरू झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *