मुंबई बाजारातील कोथिंबिरीची मागणी पूर्ण करण्यासाठी बाजारात दररोज दोन ते अडीच लाख कोथिंबिरीच्या जुड्या पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र सध्या बाजारात दीड ते पावणेदोन लाख कोथिंबीर जुड्या येत आहेत. ४० ते ४५ गाड्यांवर असलेली हिरव्या मिरचीची आवकही आता ३० ते ३५ गाड्यांवर आली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात सरासरी ४० रुपये किलो असणारी हिरवी मिरची आता ५० ते ६० रुपये किलो झाली आहे. कोथिंबीर व हिरवी मिरची महागल्याने दहा रुपयांत मिळणाऱ्या हिरव्या मसाल्यासाठी आता २० रुपये मोजावे लागत आहेत. टोमॅटो केवळ मुंबई व परिसरातच महागला नसून राज्यात इतरही काही ठिकाणी तो महागला आहे. औरंगाबादेत टोमॅटोचा भाव ८० ते ९० रुपये किलो झाला आहे. त्याचवेळी आवक वाढल्याने औरंगाबादेत कांद्याच्या दरात घसरण कायम असून ८ ते १२ रुपये किलो या दराने त्याची विक्री होत आहे.
