महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढली, उष्माघाताचे २५ बळी,विदर्भात सर्वाधिक मृत्यू

भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवला होता. महाराष्ट्रात  देखील गेल्या काही दिवसांमध्ये तापमान वाढलं होतं. वर्धा  जिलह्यातील तापमान सर्वाधिक ठरलं होतं. महाराष्ट्रात आतापर्यंत २५ जणांचा उष्माघातानं  मृत्यू झाला आहे. गेल्या सहा वर्षांमधील सर्वाधिक आकडेवारी आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये वाढत्या उन्हाचा त्रास झाल्यानं ३७४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात ४० ते ४६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील उष्माघाताचे सर्वाधिक मृत्यू विदर्भात झाले आहेत. विदर्भात १५, मराठवाड्यात ६ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगावातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

विदर्भात नागपूरमध्ये ११ , अकोला जिल्ह्यात ३ आणि अमरावतीमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात २ , औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नागपूर विभागात सर्वाधिक २९५ जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकार आणि केंद्र शासीत प्रदेशांना याविषयी एक पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारनं उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सूचना दिल्या आहेत. राज्यांच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान, व्यवस्थापन आणि क्षमता वाढविण्याबाबत जागरुक करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असे भूषण या पत्रात म्हणतात.

‘आवश्यक औषधे, आयव्ही फ्लुइड्स, बर्फाची पाकिटे, ओआरएस आणि इतर सर्व आवश्यक उपकरणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी आरोग्य सुविधेच्या सज्जतेचा आढावा घेतला पाहिजे. सर्व आरोग्य सुविधांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता आणि गंभीर भागात गारवा देणाऱ्या उपकरणांचे कार्य निरंतर सुरू असल्याची खात्री केली जावी,’ असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. नागरिकांनी उन्हामध्ये बाहेर पडू नये आणि योग्य प्रमाणात पाणी पिणं देखील आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *