विदर्भात सूर्य मुक्कामी; सहा जिल्ह्यांत पारा ४५ पार, उष्माघाताचे १९ बळी?

विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट असून, ११ पैकी सहा  जिल्ह्यांमधील तापमान ४५ अंशांहून अधिक आहे. शनिवारी चंद्रपुरात ४६.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. रविवारीसुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी चंद्रपूर राज्यातील सर्वाधिक तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. राजस्थानातील बांदा हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. याखेरीज शुक्रवारी चंद्रपूरखेरीज विदर्भातील अकोला (४५.८ अंश), वर्धा (४५.५अंश), नागपूर व यवतमाळ (४५. २ अंश प्रत्येकी) व अमरावती (४५ अंश) या पाच जिल्ह्यांमधील तापमान ४५ अंशांहून अधिक होते. याखेरीज ब्रम्हपुरी येथेही ४५.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. सध्या राजस्थान आणि विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असल्याचे हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यातच ही स्थिती असल्यास मे महिन्यात विदर्भातील तापमान ४७ अंशांपर्यंत जाणार का? अशी शंका अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. रविवारीसुद्धा विदर्भात उष्णतेची ही तीव्र लाट कायम राहणार आहे. त्यानंतर विदर्भात उष्णतेच्या सौम्य लाटेचा इशारा आहे. त्यामुळे सोमवारपासून तापमानात किंचित घसरण होण्याची शक्यता आहे.

उष्माघाताचे १९ बळी?

यंदा एप्रिल महिन्यात उष्माघातामुळे एकूण १९ जण दगावल्याची भीती व्यक्त केली आहे. या महिन्यात शहरातील विविध भागात १९ जण रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आले. यात भिकारी तसेच भिकारीसदृष्य अशा अनोखळी इसमांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दुसऱ्या दिवशीही तापमान ४५ अंशांवर

जळगाव : जिल्ह्यात गुरुवारनतंर शुक्रवारीदेखील कमाल तापमान ४५.६ अंश नोंदविण्यात आले आहे. ‘उष्णतेची ही लाट चार दिवस ही लाट कायम राहील,’ असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तापमान एप्रिल महिन्यातच ४५ अंशावर जाण्याची गेल्या दहा वर्षांतील पहिलीच वेळ आहे. तापमानासह उष्ण वारेदेखील वाहत असल्याने उन्हाच्या झळांमुळे नागरिकांना नकोसे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *