सात हजार किलो कॅरी बॅग जप्त,वर्षभरात मनपाकडून ३९ लाखांचा दंड वसूल

राज्य सरकारने प्लास्टिक कॅरी बॅगच्या वापरावर बंदी असतानाही शहरात सर्वत्र त्यांचा वापर सुरू असल्याने मनपाचे उपद्रव शोध पथक अशा विक्रेत्यांवर कारवाई करीत असते. या कारवायांतर्गत गेल्या वर्षभरात शहरात ७ हजार १९९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले; तसेच ३९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात तब्बल ३ हजार २३३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत शहरातील १४ हजार १२३ दुकानांची तपासणी करण्यात आली असून ७५३ प्रकरणांची नोंद करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅगवर बंदी असतानाही त्याचा वापर होत असल्याने महापालिकेकडून शहरातील आठवडी बाजार, इतर प्रमुख बाजारपेठा आणि लहान-मोठ्या दुकानांची नियमित तपासणी करण्यात येते. यातील अनेक ठिकाणी ग्राहकांना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये वस्तू दिल्या जातात. अशा दुकानदारांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून कारवाई केली जाते.

‘दररोज बाजारपेठांमध्ये फिरून पथकाकडून दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत दुकानदारांकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅग आढळल्यास ते जप्त करून दुकानदाराला दंड ठोठावण्यात येतो. चालू वर्षात आतापर्यंत १४ हजार १२३ दुकानांची तपासणी करण्यात आली आहे’, असे महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांनी सांगितले.

नागरिकांकडूनच मागणी

‘प्लास्टिक कॅरी बॅगच्या वापरासाठी विक्रेत्यांबरोबरच नागरिकही जबाबदार आहेत. कारण वस्तू घेतल्यानंतर नागरिकच दुकानदारांकडे कॅरी बॅगची मागणी करतात. वस्तू खरेदीसाठी बाजारात जाताना नागरिकांनी कापडी पिशवी सोबत बाळगल्यास कॅरी बॅगची गरज पडणार नाही. प्लास्टिकचा वापर कमी करण्याची मुख्य जबाबदारी नागरिकांची आहे’, याकडे तांबे यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *