राज्यातील राजकीय घडामोडींवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. भाजपचा (BJP) राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव यशस्वी होणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. तसेच, त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे .
एकनाथ खडसे, हे त्यांच्या मुक्ताईनगर येथील निवास्थानी पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे नेते गिरीश महाजन aयांनी राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप सरकारवर केला होता. त्याला खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. प्रत्यक्षात भाजप स्वत:च राज्यात अशांतता परविण्याचे काम करत असून भोंगा, हनुमान चालीसा या मुद्यावरुन बोंबा मारुन महागाईवरुन लोकांचे लक्ष विचलीत करत असल्याचेही खडसे म्हणाले.
“सत्ता नसल्याने अस्वस्थ झालेले भाजपचे नेते आदळआपट करताहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेले नाही, अशा बोंबा मारताहेत. भोंग्याकडे लक्ष वळविताहेत. महागाईवरुन सर्वसामान्य जनतेने लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपचे हे सर्व प्रयत्न सुरु आहेत”, अशी टीका नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर केली आहे. “वारंवार अशांतता परविण्याचे काम भाजप करतेय. राज्यापालांना भेटताहेत. या माध्यमातून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव भाजपाचा असून तो यशस्वी होणार नाही”, अशा शब्दात खडसेंनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतलाय.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन, हनुमान चालीसा औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरुन पुन्हा वाद पेटला आहे. तर संभाजीनगर नाव व्हावे, यासाठी मनसे आक्रमक आहे. या विषयावर बोलताना खडसे म्हणाले, समाजामध्ये, शहरा-शहरांमध्ये अशांतता पसरविण्याचे काहींचे प्रयत्न सुरु आहेत. यावेळी नाव घेता खडसेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. याउलट महागाई कमी करण्यासाठी, राज्याच्या विकासासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र, अशा प्रकरणावरुन राज्य सरकारची विनाकारण शक्ती खर्च होते. हे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने योग्य नसल्याचेही खडसे यावेळी म्हणाले.
