देशात कोरोनाची चौथी लाट आली तरी ती सौम्य राहील असा दावा सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी केला आहे. प्रवास करणा-या प्रत्येकाला बुस्टर डोस आवश्यक असून त्याबाबत काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारला आवाहन केलं असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही पुनावालांनी व्यक्त केला आहे. लसींचा पुरेसा साठा असून कमतरता भासणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू लागली आहेत. चीनमधील काही शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत तज्ज्ञांनी विविध मतं नोंदवली आहेत.
मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग आणि हॅन्ड सॅनिटायझेशन हे महत्त्वाचं आहे. जर आपण मास्कचा वापर केला आणि सामाजिक अंतर राखले, तर यामुळे एकमेकांपासून होणारा संसर्ग देखील टाळता येईल. प्रत्येकाने लसीकरण केले पाहिजे जेणेकरुन विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकत नाही. बूस्टर डोस यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. लसीकरणामुळे कोरोनाचा धोका कमी करण्यात नक्कीच मदत झाली आहे.
