एकीकडे सध्या आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यात केजरीवाल यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटावर केलेल्या भाष्यावरून घमासान सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागले पण, तिथे मुस्लिमांनाही लक्ष्य बनवले गेले होते.
