राज्यभरात सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. मात्र, या परीक्षेच्या पहिल्या दिवशी अभ्यास न झाल्याच्या भीतीने रायगडमधील एका विद्यार्थ्याने आपले आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रोहा तालुक्यातील सानेगावमध्ये हा प्रकार घडला. प्रकाश बांगारे (मुळ रा.पिंपळगाव, नागोठणे वय १७) असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने शुक्रवारी गळफास घेतला. करोनामुळे गेल्या वर्षभरात शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु होत्या. मात्र, त्यामुळे प्रकाशचा अभ्यास व्यवस्थित झाला नव्हता. त्यामुळे प्रकाश प्रचंड तणावात होता. अखेर या तणावापोटी प्रकाशने इंग्रीज विषयाच्या पेपरपूर्वी शाळेबाहेरच्या जंगलात गळफास घेऊन जीवन संपवले.
गेली दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन पद्धतीने मुलं घरीच शिक्षण घेत होती. गावकडील भागात इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे मुलांना या दोन वर्षात नीट शिक्षण मिळाले नाही. अशातच आत्ता परीक्षा ऑफलाईन असल्यामुळं मुलांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे . या विरोधात मुलांनी अनेक ठिकाणी राज्यभर निदर्शने केली तरी सुद्धा सरकार ऑफलाईन परीक्षेबाबत ठाम होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरक्षक संजय पाटील यांच्या मार्गदशनाखाली रोहा पोलीस करीत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून (चार मार्च) सुरुवात झाली. या परीक्षेसाठी राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे नऊ हजार ६३५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थी लेखी परीक्षेला सामोरे जात आहेत. करोनाच्या सावटामुळे परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व संघटनांच्या माध्यमातून केली जात होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंडळाकडून नेहमीप्रमाणे लेखी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. बारावीची लेखी परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल या कालावधीत होत आहे.
