राज्याचा ‘गरीबरथ’ थांबणार; ‘सह्याद्री’, ‘गोदावरी’ एक्स्प्रेस कायमस्वरूपी बंद

राज्याचा ‘गरीबरथ’ अशी ओळख असलेल्या सह्याद्री आणि गोदावरी एक्स्प्रेस कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्या बंद करण्यामागे नेमके कारण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. मात्र, रेल्वे मंडळाकडून ‘झीरो बेस्ड टाइमटेबल’ची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याने कमी प्रतिसादाच्या गाड्या बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

करोना नियंत्रणात आल्यानंतर मध्य रेल्वेवर ९५ टक्क्यांहून अधिक मेल-एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवासी प्रतिसाद वाढत असल्याने या गाड्या पूर्ण प्रवासी क्षमतेने धावत आहेत. प्रतिसाद वाढत असतानाच लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस आणि मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस बंद करण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

देशात ‘झीरो बेस्ड टाइमटेबल’ लागू करण्यात येत आहे. यामुळे हंगाम वगळता अन्य वेळी तोट्यात धावणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येत आहेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रतिसाद अशी कसोटी यासाठी निश्चित करण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत रेल्वेने अधिकृत घोषणा केलेली नाही. करोना काळातील पहिल्या लॉकडाउनमध्ये बंद झालेल्या मेल-एक्स्प्रेस पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, कमी प्रतिसादाच्या रेल्वेगाड्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय गाड्या म्हणून सह्याद्री, गोदावरी एक्स्प्रेसची ओळख आहे. या दोन्ही गाड्या १७ डब्यांच्या आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता गाड्या बंद करण्यात आल्याने नागरिकांमधून प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी जालना जनशताब्दी एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे वाढवण्यात आले आहेत. मात्र प्रवासी प्रतिसाद लक्षात घेता हे डबे अपुरे पडत असल्याने या मार्गावरील अन्य रेल्वेगाड्यांना गर्दी वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *