लाखांदूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यावर आभाळ कोसळले आहे. एकापाठोपाठ पाच बैलांचा पाणी प्यायल्याने तडफडून मृत्यू झाला आहे. विषबाधेने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शेतातली कामे आटपून घरी आलेल्या प्रेमदास मेश्राम या शेतकऱ्याने आपल्या बैलांना नेहमीप्रमाणे टाकीवर पाणी पिण्यासाठी आणले. मात्र हे पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच बैल तडफडायला लागले.
घाबरलेले शेतकरी प्रेमदास यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. मात्र उपचारादरम्यान पाचही बैल मृत पावले. या बैलांच्या मृत्यूने शेतकरी प्रेमदास यांचे लाखोंचं नुकसान झाले आहे. शासनाने या शेतकऱ्याला मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
