गणेश विसर्जनादरम्यान होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता यंदा महापालिकेतर्फे विसर्जन वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जन वाहनांची नेमकी स्थिती समजून वाहतूक नियोजन करणे पोलिसांना सोपे होणार आहे.
गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा बैठक
गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयात गुरुवारी महापौर नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अपर पोलिस आयुक्त विनीता शाहू व वसंत परदेशी, अतिरिक्त आयुक्त अंकित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रमाणपत्रे ऑनलाइन पद्धतीने दिली जात आहेत.
बैठकीत आयुक्त डॉ. इटनकर यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव मंडळांना परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्रे ऑनलाइन पद्धतीने दिली जात आहेत. यात वाहतूक, अग्निशमन आणि विद्युत विभागाच्या मंजुरीचाही समावेश आहे. नियमितपणे त्याच ठिकाणी गणेशोत्सव साजराकरणाऱ्या मंडळांना तातडीने मंजुरी देण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जीपीएस बसविण्याचा प्रयोग
विसर्जनाच्या वेळी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी विसर्जन वाहनांवर जीपीएस बसविण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. वाहनांची हालचाल आणि गर्दीची ठिकाणे समजल्यास वाहतूक विभागाला तातडीने उपाययोजना करता येतील. धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगीही यंदापासून ऑनलाइन एक खिडकी पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
एक खिडकी योजना प्रभावीपणे राबवावी
ना हरकत प्रमाणपत्रे आणि परवानग्या ऑनलाइन पद्धतीने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी योजना प्रभावीपणे राबवावी, असे महापौरांनी सांगितले. सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांनी विसर्जनस्थळी टॉवर उभारून ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याची सूचना केली.
गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या वेळेत मिळतील
गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या वेळेत मिळतील, असा विश्वास पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलयांनी व्यक्त केला. मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी आगीपासून संरक्षणासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. आग लागल्यास मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक बाधित होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दी नियंत्रण, घातपात रोखणे आणि वाहतूक व्यवस्थापन या तीन बाबींवर विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
