मुलाचा अट्टाहास मुलींच्या जीवावार, बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सर्वात कमी

बीड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी आहे. स्त्रीभ्रूण हत्येचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मुलींचा जन्मदर अत्यंत कमी आल्याची माहिती समोर आली आहे. कोव्हिड काळात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालंय.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात हजार मुलांमागे केवळ 764 मुलींचा जन्म झाला आहे. कोव्हिड काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टाहास केल्याने ही भयानक स्थिती उद्भवली असल्याचे PCPNDT च्या अशासकीय सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी सांगितले आहे. समाजातील सर्वच घटकांना विचार करायला लावणारी ही स्थिती आहे.

पाटादो तालुक्यात मुलींचा जन्मदर सर्वात कमी म्हणजे ७६४ इतका आहे. केज, शिरुर या तालुक्यातही मुलींचा जन्मदर कमी आहे. मुलाच्या जन्माचा हट्टहास हा समाजातील प्रत्येक स्तरात वाढत गेला हे त्यामागचं कारण आहे, असं डॉ. आशा मिरगे यांनी म्हटलं आहे. आपल्या महाराष्ट्राचा जर बिहार, राजस्थान, हरियाणा होऊ द्यायचा नसेल तर  यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचं डॉ. आशा मिरगे यांनी म्हटलं आहे.

‘बीड जिल्ह्याची कन्या म्हणून हे दुर्देवी चित्र’
बीडच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. मागच्या काही वर्षात बीड जिल्ह्यात सर्वात कमी मुलींचा जन्मदर असल्याने मंत्रिकाळात, तसंच पालकमंत्री होते तेव्हा आम्ही PCPNDT अॅक्टचं फार काटेकोरपणे पालन केलं. त्यामुळे जे स्त्रीभ्रुण हत्या करतात, त्यांच्यावर धाक होता, पण आता अशा लोकांवर कोणताही अंकुश राहिलेला नाही, हे दुर्देवी आहे, प्रशासकांचा वचक राहिलेला नाही, लोकांचं प्रबोधन आणि जागृतीचे कार्यक्रम दिसत नाहीत असा आरोप करत पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याची कन्या म्हणून हे दुर्देवी चित्र असल्याचं म्हटलं आहे.

आपण आमदार झालो तेव्हा बीड जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यात मुलींची संख्या सर्वात कमी होतं, त्यानंतर आम्ही योजना राबवल्या, प्रबोधन केलं, मंत्री झाल्यानंतर ‘माझी कन्या भाग्यश्री’ सारखी योजना राबवली. ‘बेटी  बचाव, बेटी पढाव’ अभियान यशस्वीपणे राबवलं. याचा परिणाम म्हणेज मुलींच्या जन्मदराचा आकडा ९६१ पर्यंत गेला होता.

आता गेल्या दोन वर्षात यो योजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे, PCPNDT अॅक्टबाबत थोडी ढिलाई झालेली दिसतेय, ही सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी आहे. शासनाने लक्ष घालण्याची गरज आहे असं मागणी पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मी आव्हान करते की लोकांनी अशा गोष्टींकडे वळू नये, मुलीसुद्धा आपला आधार आहेत असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *