२४ जानेवारीपासून विमानतळाचे काम बंद पाडणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी आता एल्गार पुकारला आहे. विमानतळाच्या नावासाठी शांततेच्या मार्गाने भूमिपुत्रांनी अनेक आंदोलने केली. मात्र सिडको व राज्य सरकारकडून भूमिपुत्रांच्या या आग्रही मागणीकडे काणाडोळा केला जात आहे. अद्याप नावाबाबत कोणतीच घोषणा करण्यात आली नसल्याने आता सरकारला २३ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत कोणताही निर्णय न झाल्यास २४ जानेवारीपासून विमानतळाचे काम बंद पाडण्याचा निर्णय भूमिपुत्रांनी घेतला आहे.

या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी नुकतीच एक बैठक पनवेल परिसरात पार पडली. यात सिडको व राज्य सरकारपर्यंत मागण्या आक्रमकपणे मांडण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. त्यासाठी १३ जानेवारी रोजी २७ गाव प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्र निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्व ठिकाणांचे भूमिपुत्र सहभागी होणार आहेत. त्यानंतर २३ जानेवारीपर्यंत याबाबत काहीच निर्णय न झाल्यास २४ जानेवारीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सुरू असलेले काम बंद करण्याचा निर्णय भूमिपुत्रांनी घेतला आहे. अनेक नेत्यांनी केवळ देखावा करत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरण आंदोलनाचे केवळ राजकारण केले. त्यामुळे आता प्रकल्पबाधित २७ गाव एकत्र आले आहेत. राजकीय नेत्यांना बाहेर फेकल्याने आता न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका भूमिपुत्रांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *