करोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, मुंबईतील दोन वकिलांनी मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली आहे. कोविड बुस्टर डोस देण्यासंदर्भात एक ठोस धोरण तयार करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती याचिकेद्वारे हायकोर्टाकडे केली आहे.
वकील धृती कापडिया आणि कुणाल तिवारी यांनी मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे. देशात संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशावेळी करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना लवकरात लवकर बुस्टर डोस देण्याची नितांत आवश्यकता आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. आगामी सण-उत्सव आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुस्टर डोस उपलब्ध करून दिल्यास दिलासा मिळू शकेल, असेही त्यात नमूद केले आहे.
