राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या खास शैलित उत्तर दिलं आहे.
शरद पवार यांचं उत्तर
सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. चंद्रकांत पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यातील विधिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार आहे. त्यामुळे जे अस्वस्थ झाले आहेत, त्यांच्याकडून अशी विधाने होत आहेत. या आधी सुद्धा अशी विधान केली गेली, पण राज्यातील जनतेवर त्याचा काही परिणाम झाला नाही, अशी विधाने गांभीर्याने घेत नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं होतं
राज्यात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं विधान केलं होतं. विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यपालांनी दोन वेळा निवडणुकीच्या तारखा देऊनही ठाकरे सरकारन निवडणूक घेतली नाही. हा राज्यपालांचा आणि घटनेचा अवमान आहे. या मुद्दयावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.
