अवकाळी पावसाने वांगी पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने बाजारातील आवक घटली असल्याने सांगलीच्या बाजारात चिकनपेक्षा वांगी महाग अशी स्थिती झाली आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या काटेरी कुडची वांग्याचा दर १६० रुपये किलो, तर चिकनचा दर दीडशे रुपये किलो आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले असून वांग्याचीं फूलगळ झाली आहे. तसेच वांग्यावर किडीचाही मोठा प्रादुर्भाव झाल्याने वांग्याची आवक कमालीची घटली आहे. यामुळे बाजारात वांग्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बाराशे ते तेराशे रुपये दहा किलो दर उत्पादकांना मिळत असून किरकोळ बाजारात चाळीस रुपये पाव किलो या दराने वांग्याची विक्री केली जात आहे. टोमॅटोचा दर मात्र उतरला आहे. ऐंशी ते शंभर रुपये किलोवर गेलेला टोमॅटोचा दर चाळीस रुपयापर्यंत खाली आला आहे. अन्य भाज्यांचे प्रति किलोचे दर पुढील प्रमाणे गवार शंभर रुपये, भेंडी ८० रु., घेवडा, पावटा ६० ते ८०, दोडका, ६० रूपये, ढबू मिरची ४० रूपये असे दर आहेत. मेथीचा जुडीचा दर २० रूपये, तर कांदा पात, तांदळ, पालक, शेपू, लाल माट या भाजीची जुडी १५ रूपये तर करडा १० रूपये असे दर बाजारात आहेत.
चिकनच्या मागणीत घट
मार्गशीर्ष महिन्यात बहुसंख्य महिला वर्ग गुरूवारचे लक्ष्मी व्रत करीत असल्याने अनेक घरात मांसाहार टाळत असल्याने चिकनची मागणी कमी झाल्याने दरही कमी झाले आहेत. दिवाळीनंतर एक महिना चिकनचा दर किलोला १८० रुपये होता. अनेक कुटुंबामधील महिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी व्रत करीत असल्याने मांसाहार वज्र्य केला जातो. याचाही परिणाम चिकनच्या मागणीवर होऊन विक्रीमध्ये घट झाली आहे. यामुळे चिकनचे दर दीडशे रुपये किलो असे झाले आहेत.
