कल्याणच्या ३ लहान मुलांनी केला पराक्रम

कल्याणमधील ३ लहान मुलांनी कठीण समजला जाणारा मलंगगड दोरखंडाने पार केला आहे. कुठेही घाबरून न जाता ३ मुले गडावर गेले. ओम ढाकणे (वय ४), परिणीती लिंगे(वर्षं ७) आणि अवंती गायकवाड(वय ७) अशी या तीन मुलांची नावं असून त्यांनी कठीण समजला जाणारा मलंगगड दोरखंडाने पार केला आहे. सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहण संघाच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी हा गड पार केला. या साहसी मुलांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मलंगगड म्हणजे माथेरानच्या डोंगररांगेमध्ये वसलेला गड. समुद्रसपाटीपासून मलंगगडाची उंची तीन हजार दोनशे फूट उंच आहे. विशेष म्हणजे किल्ल्याच्यावर गेले की जीर्ण झालेला वाडा दिसतो. तसेच पाण्याच्या टाक्या सुद्धा उपलब्ध आहेत. इतिहास काळात किल्ल्याचा वापर हा कल्याण, भिवंडी, बदलापूर अशा जवळच्या शहरांवर लक्ष देण्यासाठी बनवला गेला असावा अशी रचना आहे. कल्याणच्या दक्षिणेपासून अवघ्या सोळा किलोमीटवर हा बांधण्यात आला आहे. पनवेलवरुन वावंजे गावपासून हा किल्ला दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. बदलापूरच्या नैर्ऋत्येस आणि मुंबईच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा, उरण नैर्ऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर, माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला होता.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

माचीवरून सरळ पुढे जात पलीकडचे टोक गाठलं की तेथून एका चोरवाटेने खाली उतरले की गडाच्या निम्म्या उंचीवर एक आश्रम लागतो. तिथून गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाच्या दिशेने वळसा घेत जाणाऱ्या वाटा निघतात. पहिली वाट खाली वावंजे गावात जाते. तेथून पनवेलला जायला एसटी मिळते. उत्तर दिशेच्या वाटेने गेले की दोन वाटा फुटतात. सरळ जाणारी वाट गडाला वळसा घालून पालखीसारख्या आकाराच्या खडकाखालून किल्ल्यावर जाते. उजवीकडे खाली उतरणारी वाट मलंगगड व गणेश कार्तिक सुळक्यांचा डोंगर यांच्यामधील खिंडीत पोहचते.

माचीवरून बालेकिल्याकडे जाण्यासाठी कडाला उजवीकडे ठेवत वळसा घालून गेले की खोदीव पायऱ्या दिसतात. पायऱ्यापुढे एक गुहा व पाण्याचे टाके आहे. येथून पुढे जाणे कठीण आहे. पन्नास साठ पायऱ्यांनंतरच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. तो भाग चढण्यासाठी दहा बारा फूटांचा एक पाइप आडवा टाकलेला आहे आणि हातांच्या आधारासाठी दोर लावला आहे. हा अवघड टप्पा पार करून दहा मिनिटांत गडमाथ्यावर पोहचता येते. शिरोभाग तसा लहान आहे. छप्पर उडालेले पण भिंती शाबूत असलेला एक वाडा दिसतो. त्याच्या मागे खोदलेली सात टाकी आहेत.
बालेकिल्याच्या मध्यभागी औदुंबराच झाड आहे. आणि काही ठिकाणी तटबंदीही आहे. बालेकिल्याच्या समोरच देवणीचा सुळका आहे. येथे येणारे भाविक या समोरच्या देवणीवर एक दगड फेकून मारण्याचा सोपस्कार करतात. दगड जर देवणीवर पोहोचला तर मनातली गोष्ट साध्य होते असे म्हणतात. पूर्वेकडून नैऋत्येकडे गोरखगड, राजमाची, माथेरान, पेब, इर्शाळ, प्रबळ परिसर दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *