कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार चंद्रकांत जाधव यांचे मध्यरात्री दोन वाजता दुःखद निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्याच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू होते.
गेल्या वर्षी जाधव यांना करोनाची बाधा झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत गेली होती. तरीही शहराच्या प्रत्येक प्रश्नात ते लक्ष घालत होते. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून अनेक कामांमध्ये हिरीरीने सहभागी होत होते. पाच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या अन्ननलिकेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण याच वेळी त्यांचा रक्तदाब कमी झाला. तो शेवटपर्यंत नियंत्रणात आला नाही. अखेर काल मध्यरात्री त्यांचे निधन झाले.
जाधव हे कोल्हापुरातील एक प्रथितयश उद्योजक होते. त्यांनी गोशिमा या उद्योजकांच्या संघटनेवर काम करताना उद्योजकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सरकार दरबारी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले होते. कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूना ते सतत मदत करत असत. त्यामुळे फुटबॉल संघाचा आधारस्तंभ म्हणून त्यांची क्रीडा क्षेत्रात ओळख होती. पाच वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केले. कोल्हापूर महापालिकेत त्यांच्या पत्नी जयश्री आणि बंधू संभाजी हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले.
‘चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व, जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकप्रतिनिधी, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, जिल्ह्यातलं क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही महाविकास आघाडीची मोठी हानी आहे. आम्ही सर्वजण जाधव कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
