पुण्यात साडेतीन हजार नागरिक लशीविना

शहरातील ९६ टक्क्यांहून अधिक नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असला, तरी महापालिकेने १२ हजार घरांमध्ये केलेल्या प्राथमिक पाहणीत तीन हजार ७२९ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लशीचा एकही डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे. तर, साडेनऊ हजार नागरिकांचा लशीचा दुसरा डोस अद्याप बाकी आहे.

लशींचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही नागरिकांनी लसीकरण पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तातडीने लस घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

देशभराप्रमाणेच पुणे शहरातही १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्याला मंगळवारी दहा महिने पूर्ण झाले. आतापर्यंत देशभरात ११ कोटी ३६ लाखांहून अधिक नागरिकांना करोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. त्यामुळे शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घरोघरी जाऊन लसीपासून वंचित असलेल्या नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम देशभर सुरू करण्यात आली आहे.

‘केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार शंभर टक्के पात्र नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागानेही आठ नोव्हेंबरपासून घरोघरी जाऊन लसीकरणापासून वंचित नागरिकांची माहिती घेऊन त्यांचे समुपदेशन सुरू केले आहे,’ असे महापालिकेचे लसीकरण प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागाने १२ हजार ४५ घरांना भेट देऊन पाहणी केली आहे. यामध्ये या घरांमध्ये राहणाऱ्या व लसीकरणासाठी पात्र असलेल्या (१८ वर्षांपुढील) नागरिकांची माहिती नोंदवली जात आहे. आजवरच्या पाहणीत ३ हजार ७२९ पात्र व्यक्तींनी अद्याप लशीचा एकही डोस घेतलेला नाही. तर, नऊ हजार ५८७ जणांचा दुसरा डोस बाकी आहे. सध्या कोव्हिशील्ड लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये ८४ दिवसांचे अंतर आहे. या साडेनऊ हजार नागरिकांपैकी अनेक नागरिकांच्या पहिल्या डोसनंतर ८४ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप त्यांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या नागरिकांचे समुपदेश करून त्यांना लस घ्यायला लावण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला कसरत करावी लागणार आहे.

पालिकेचे लसीकरणाचे आवाहन
ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत कोव्हिशील्डचा पहिला डोस घेणारे सर्व नागरिक आता दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. सध्या सर्व बंधने शिथिल झाल्याने आणि अनेक नागरिकांनी लस घेतल्याने दुसरा डोस नाही घेतला तरी चालेल अशी धारणा अनेक नागरिकांनी करून घेतली आहे. मात्र, करोनाचा संसर्ग आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम असल्याने सर्व नागरिकांनी लशींचे दोन्ही डोस पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. सर्व पात्र नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासह केंद्र सरकारच्या सूचनांनुसार त्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *