लोहगाव विमानतळ चौदा दिवसांसाठी बंद ठेवण्याची घोषणा विमानतळ प्रशासनाने मंगळवारी ऐन वेळी केली. त्यामुळे या काळातील विमान उड्डाणांची तिकिटे आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासाची पर्यायी सोय करणे, तिकीट रद्द करणे आदी गोष्टींसाठी मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
लोहगाव विमानतळ हवाई दलाचा तळ असून, त्यांच्याकडून धावपट्टीची दुरुस्ती केली जात आहे. त्यासाठी उड्डाणे पूर्णत: बंद ठेवली जाणार आहेत. साधारण: प्रवासाच्या तीन महिने आधीपर्यंत विमानाची तिकिटे आरक्षित करता येतात; तसेच तिकिटे स्वस्तात मिळतात म्हणून काही महिने आधीच तिकिटे आरक्षित करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे ‘विमानतळ बंद केव्हा ठेवला जाणार,’ याची माहिती हवाई दलाकडून काही महिने आधी मिळणे अपेक्षित असतानाही ती ऐन वेळीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
