सिंधू नदी पाणीवाटपाच्या समस्येवरील दोन पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील अरबी समुद्राच्या नामांतराचे सूतोवाच के ले. भौगोलिक परिस्थिती नेहमी बदलत असते, त्यामुळे सिंधू नदी पुनश्च भारताचा भाग असेल, असा आशावाद जागविताना मुंबईतील अरबी समुद्राला वास्तविक सिंधुसागर हेच नाव सार्थ आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात अशोक मोटवानी व संत कुमार शर्मा लिखित ‘इंडस वॉटर्स स्टोरी’ आणि उत्तम सिन्हा लिखित ‘इंडस बेसिन इंटरप्टेड’ या दोन पुस्तकांचे येथे प्रकाशन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. सिंधू नदी हा केवळ भौगोलिक प्रश्न नसून भारताच्या दृष्टीने त्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक परिमाण आहेत. सिंधू नदी पुनश्च भारताचा भाग बनेल, असा आशावाद व्यक्त करीत त्यांनी मुंबईतील अरबी समुद्राला सिंधुसागर हेच नाव योग्य असल्याचे प्रतिपादन केले. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील अतिशय संवेदनशील असा पाणीवाटपाच्या प्रश्नाचा इतिहास, वर्तमान स्थिती, चिंता व भवितव्याचा वेध या बाबींचा या दोन्ही पुस्तकांमध्ये ऊहापोह केला आहे. कार्यक्रमाला लेखक अशोक मोटवानी यांच्यासह अमेरिकेच्या मुंबईतील दूतावासातील अधिकारी स्कॉट टिकनॉर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताचे संघचालक डॉ. सतीश मोढ, ‘ऑर्गनायझर’चे माजी संपादक डॉ. शेषाद्री चारी, मुंबई स्टॉक एक्स्चेंजचे मुख्याधिकारी डॉ. आशीष चौहान, प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा, डॉ. राधाकृष्ण पिल्लई, एस. बालकृष्णन, बाळ देसाई आदी उपस्थित होते.
