पुनर्वसनाच्या नावाखाली महापालिकेने तात्पुरती सोय म्हणून पोखरण २ परिसरातील अॅक्मे रेंटल या इमारतीमधील ५०६ सदनिकांमध्ये दोन हजार लोकांचे स्थलांतर केले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून पालिकेने त्यांना हक्काची घरे दिलेली नसून इमारतींमधील अनेक असुविधांमुळे येथील लोक नरकयातना भोगत आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये आलेल्या घरांतील लोकांना एका वर्षात सदनिका देण्याचे आश्वासन देऊन चार वर्षे लोटली तरी महापालिकेला जाग आलेली नाही.
पोखरण रोड २ वरील २२ मजल्यांची अॅक्मे रेंटल इमारत सात वर्षे जुनी आहे. चार वर्षांपूर्वी कळवा, माजीवडा, राबोडी आणि कोपरी परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामात येणारी घरे हटविण्यात आली. त्यावेळी तात्पुरते पुनर्वसन म्हणून या परिसरातील दोन हजार लोकांचे पुनर्वसन अॅक्मे रेंटल इमारतीमध्ये करण्यात आले. यावेळी पालिकेने एका वर्षात सदनिका देऊन स्थलांतर करण्याबाबचे पत्रही रहिवाशांना दिले होते. मात्र, याला चार वर्षे लोटली तरी महापालिकेला याबाबत कोणतीही कार्यवाही करण्याची इच्छा नाही. यामुळे पालिकेच्या या इमारतींमध्ये देखभाल-दुरुस्तीअभावी या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पालिका दर महिना महिन्याला ५० रुपये घेऊनही चार दिवसांतून एकदा पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे स्वच्छतागृहासाठी पाण्याची तीव्र टंचाई असते. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून इमारतीमधील चारही लिफ्ट बंद असल्यामुळे २२ माळे चढून जावे लागतात. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे केवळ सात वर्षे जुन्या इमारतीमध्ये अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे बहुतेक घरांमध्ये पाणी साचलेले असते. पालिकेच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना, विशेष करून लहान मुलांना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
तत्कालीन महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रकल्पबाधित लोकांना वाऱ्यावर सोडून दिले असून गेल्या चार वर्षांपासून पुनर्वसनाच्या आशेपोटी येथील लोक नरकयातना भोगत आहेत. या नागरिकांचे स्थलांतर लवकर न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी विभाग शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे.
कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य प्रत्येक मजल्यावर आहे. तसेच पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर असून दूषित पाण्याचा पुरवठ्यामुळे आमच्या घरातील लहान मुलांना डेंग्यू मलेरियासारख्या भयंकर रोगांचा सामना करावा लागत आहे.