राज्यातील शाळांचे चित्र पालटणार, आदर्श शाळांसाठी 494 कोटी रुपयांचा निधी

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील 488 शासकीय शाळा  , आदर्श शाळा  होणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या  बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

आदर्श शाळा करण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  सरकारने भर दिला आहे. आदर्श शाळेतील  विद्यार्थ्यांमध्ये 21 व्या शतकातील कौशल्यांचा विकास होईल याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाईल. यामध्ये नवनिर्मितीला चालना देणारे, समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती – संविधानिक मूल्ये अंगी बाणवणारे, सोबत काम करण्याचे कौशल्य तसेच संभाषण कौशल्य या सारखी अन्य कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने काल मंजुरी देण्यात आलेल्या 488  आदर्श शाळांच्या विकासासाठी 494 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळांमधील भौतिक सुविधांचा तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करून आदर्श शाळांची निर्मिती केली जाईल. भौतिक सुविधांच्या विकासामध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, ICT लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय यासारख्या सुविधांचा समावेश राहील.

शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक पोषक  वातावरण उपलब्ध  करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील याकडे लक्ष देण्यात येईल. शाळेच्या  ग्रंथालयामध्ये पूरक वाचनाची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ, इनसायक्लोपिडिया उपलब्ध असतील. स्वअध्ययनासोबतच गट अध्ययनासारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रमही  याअंतर्गत राबविले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *