राज्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर जालना जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून आज पहाटेपासून सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार असून पीक वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पहाटेपासूनच विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली असून आभाळ भरून आलेले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असून अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने लातूर जिल्ह्यात आज चांगलीच हजेरी लावली. रात्री आणि सकाळी झालेल्या पावसाने शेतकरी आनंदला असला तरी काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर, औसा, निलंगा, अहमदपूर यासह इतर तालुक्यात काल रात्री पासुन पावसाने दमदार हजेरी लावली. एका बाजूला पिकास या पावसामुळे जीवदान मिळत असताना काही भागात पिके आडवी झाली आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी पिकांचे नुकसान

जिल्ह्यातील तपसेचिंचोली, गाडवेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे ऊस मोठ्या प्रमाणावर आडवा पडला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याप्रमाणेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात मूग, उडीद, मका या पिकाचे नुकसान झाले आहे. एकीकडे सोयाबीन वर गोगलगाई हल्ला करून सोयाबीन फस्त करत आहेत, तर दुसरीकडे वादळी वारा आणि पावसामुळे उसाचे नुकसान होत आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली जात आहे.
नगर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस
बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठावाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून पाथर्डी तालुक्यात १९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. पाथर्डी तालुक्यात घरे पडली, पिकांचेही नुकसान झाले आहे. पुढील काही तास पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवान विभागाने वर्तविला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *