महावितरणवर कर्मचाऱ्यांच पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ

महावितरणवर कर्मचाऱ्यांच पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ

करोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास दीड वर्षांपासून वीजबिल वसुलीचा आलेख सातत्याने खालावत गेला आहे, अशी चिंता कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी व्यक्त केली. बिलांच्या थकबाकीमुळे महावितरणला दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ आली असून ही बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू विजबिलासह थकबाकी वसुलीला गती देण्याचे निर्देश रेशमे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महावितरणच्या कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांची मुख्य कार्यालयात वीज खरेदी विभागात बदली झाली असून त्यांच्या जागी मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अग्रवाल यांच्या सत्कारानिमित्त कल्याण परिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये रेशमे यांनी वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीविषयी चिंता व्यक्त केली. यावेळी नवनियुक्त मुख्य अभियंता औंढेकर, नाशिक परिमंडळाचे नवनियुक्त मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, जळगाव परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता फारुख शेख उपस्थित होते. रेशमे पुढे म्हणाले की, करोनासह निसर्ग आणि तौक्ते चक्री वादळाच्या नैसर्गिक आपत्तीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अखंडित वीज पुरवठ्यासाठी जीवाची बाजी लावली. परंतु वेळेवर वीजबिल भरून ग्राहकांकडून या सेवेचे मोल झाले नाही. मोबाइल, टीव्ही आदी सेवांचे पैसे वेळेवर भरले जात असताना उधारीवर दिलेल्या विजेचे बिल भरण्याकडे दुर्लक्ष झाले. ग्राहकांना अत्यावश्यक असलेल्या विजेचे बिल वेळेत भरण्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कल्याण परिमंडळातून बदली झालेले अधीक्षक अभियंता सुनील काकडे, ज्ञानेश कुळकर्णी, किशोर परदेशी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, किरण नागावकर, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, विशाल भवर यांच्यासह अभियंते, अधिकारी, कर्मचारी व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *