जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी २५ ऑगस्टपासून खुले करण्यात येणार आहे. कास पठारावर रानहळद(चवर) आभाळी, निलिमा गेंद आदी फुले उमलण्याची नव्याने कळ्या येणं सुरू झालेलं आहे. अधून-मधून पठारावर ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे.वातावरणाने आज पर्यंत साथ दिली आहे. यापुढेही वातावरणात मोठे बदल झाले नाहीत तर पठार पर्यटकांना खुले होणार आहे. करोनाचे नियम पाळत ऑनलाइन बुकिंगने पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. स्थानिक परिस्थितीनुसार, १ सप्टेंबरपर्यंत अधिकृतरित्या फित कापून हंगामाचे उद्घाटन करण्यात येईल.
हंगाम पर्यटकांना खुला करण्यासाठी व पदाधिकारी निवड करण्यासाठी नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागीलवर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र, नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने कास पठाराच्या संयुक्त कार्यकारी वन समितीने बैठक आयोजित करून पुष्प पठार पर्यटकांसाठी येत्या २५ ऑगस्टनंतर खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २१ ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात येणार आहे. “फुलांचा हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून कर्मचारी प्रशिक्षण व इतर आवश्यक तयारी झाली. २५ ऑगस्टनंतर दोन-तीन दिवसांत अधिकृतपणे हंगाम सुरू करण्यात येईल.”, असं वनक्षेत्रपाल आर एस परदेशी यांनी सांगितलं.

