बीडमधील सातशेहून अधिक गावे करोनामुक्त

सध्या जिल्ह्यातील ७५९ गावे करोनामुक्त झाली असून १४ गावांमध्ये पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असली तरी गुरुवारच्या अहवालात १४३ नवीन बाधितांची भर  पडली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी ५ हजार ८५२ तपासणी अहवालात १४३ बाधित आढळले आहेत. आष्टी तालुक्यात सर्वाधिक ६६, पाटोद्यात वीस तर बीड आणि वडवणी तालुक्यात प्रत्येकी बारा रुग्णांची नोंद झाली आहे. आष्टी तालुका संसर्ग प्रवण क्षेत्र ठरू लागला आहे. सुरुवातीपासूनच या परिसरात रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणावर आढळून येत आहे. बहुतांश गावामध्ये दोन ते तीन रुग्ण आढळत आहेत. काही गावांमध्ये एकाचवेळी पाच पेक्षा अधिक रुग्णांना लागण होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. प्रशासनाने कडक निर्बंध केले, गावोगाव सर्वेक्षण करून माहिती संकलित केली. लसीकरणावर अधिक जोर दिला. तरीही संसर्ग कमी होत नसल्याने प्रशासनापुढील आव्हानही वाढले आहे. पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ७५९ गावे करोनामुक्त झाली असून काही गावांमध्ये मात्र सातत्याने रुग्ण आढळत आहेत. बाधितांच्या संख्येने आतापर्यंत एक लाखाचा टप्पा ओलांडला असून दररोज शंभर ते दीडशेपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत.

आष्टी तालुका संसर्ग प्रवण : १४ गावांमध्ये पाचपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असून त्यामध्ये आष्टी तालुक्यातील कडा, बेळगाव, सुलेमान देवळा, चोभानिमगाव, जांबगाव, कासारी, गेवराई तालुक्यातील मुगगाव, अंतापूर, पाटोद्यातील पाटोदा, कुंबेफळ, केजमधील चंदनसावरगाव, बीड  तालुक्यातील लोणी घाट या ठिकाणी रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न केले जात आहेत. आष्टी तालुका संसर्ग प्रवण क्षेत्र ठरू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *