स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खारघर रेल्वे स्टेशन ते टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालयदरम्यान ‘एनएमएम’टी बससेवा अखेर सुरू करण्यात आली आहे. टाटा रुग्णालयाच्या वतीने अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.
या बससेवेच्या शुभारंभप्रसंगी रुग्णालय प्रशासनाने खारघर टाटा रुग्णालय ते परेल टाटा रुग्णालयदरम्यान ही बस सुरू करण्याच्या मागणीही केली आहे. याबाबत लवकरच सर्वेक्षण करून बस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन ‘एनएमएमटी’ने दिले आहे.
खारघरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालय सुरू आहे. आता या रुग्णालयाचा विस्तारही होणार आहे. या ठिकाणी देशातील सर्वच भागांतून कर्करोग रुग्ण येत असतात. त्यात ईशान्य भारत व उत्तर भारतातून येणाऱ्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. रिक्षा, टॅक्सी करून या रुग्णालयात जाणे त्यांना परवडत नाही. लोकलने हे रुग्ण खारघर स्टेशनपर्यंत येतात तेव्हा रिक्षाला किमान ७० ते ८० रुपये, तर १५० पर्यंत भाडे टॅक्सी आकारते. त्यात मीटरने भाडे न आकारता जादा भाडे आकारले जाते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसत असतो. त्यामुळे बससेवेची गरज होती. तशी मागणी रुग्णालय प्रशासनाने एनएमएमटी प्रशासनाकडे केली होती. गेल्या दीड वर्षापासून या बससेवेसाठी प्रयत्न सुरू होते.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी याची दखल घेत या मार्गाचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, उपसंचालक डॉ. नवीन खत्री, डॉ. प्रसन्न व्यंकटा, डॉ. राजेश दीक्षित, डॉ.पंकज चतुर्वेदी आणि एनएमएमटीचे मुख्य वाहतूक अधिकारी अनिल शिंदे उपस्थित होते.