शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा केदार ऊर्फ गणेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचे सुत्र सुरूच आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत धमकी, दरोडा, खंडणी असे गुन्हे दाखल असतानाच आता सांगवी पोलिस ठाण्यात पुन्हा एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
रिव्हॉल्वरचा धाक दाखवून कागदपत्रांवर सह्या घेऊन मालमत्ता बळकावल्याप्रकरणी त्यांच्यासह पाच जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश पोपट काटे (वय ३९, रा. काटेनगर, पिंपळे सौदागर, सध्या रा. रायगड) यांनी शुक्रवारी (३० जुलै) पहाटे सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १३ सप्टेंबर ते २०१७ ते २२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली आहे. फिर्यादी घाबरत असल्याने त्यांनी उशिरा फिर्याद दिली आहे. त्यानुसार नानासाहेब गायकवाड, केदार ऊर्फ गणेश गायकवाड (दोघेही रा. औंध), राजू दादा ऊर्फ अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा. पिंपळे निलख), सचिन वाळके व संदीप वाळके (दोघे रा. विधाते वस्ती, बाणेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींकडून व्याजाने दोनदा पैसे घेतले होते. हे पैसे त्यांनी दोन्ही वेळेस व्याजासकट परत केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, आरोपी गायकवाड यांनी आणखी ८० ते ८५ लाख रुपयांची मागणी फिर्यादीकडे केली. पैसे द्यायचे नसतील, तर पिंपळे सौदागर येथील जमीन आणि घर नावावर करून दे, अशी धमकी दिली.
