ठाण्यात पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने ठाण्याच्या शहरी भागात शनिवारी मध्यरात्रीपासून जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. ठाणे शहरामध्ये रविवारी सकाळपर्यंत १८३ मिमी. पावसाची नोंद झाली. तर, एकूण पाऊस १७०२.१८ मिमी. इतका पडला असून गतवर्षीच्या तुलनेतही यंदाचा पाऊस जास्त आहे. गतवर्षी याच दरम्यान १३३०.१७ मिमी. पावसाची नोंद झाली होती. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भास्कर कॉलनी, चिखलवाडी, तबेला, भांजेवाडी हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. स्थानिकांच्या घरांमध्ये कंबरेहून अधिक पाणी भरले होते. पाण्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तर, तबेल्यातील जनावरे रस्त्यावर आली होती. या भागातील नागरिक जीव वाचवण्यासाठी पाण्यातून रस्त्यावर आसरा शोधण्याचा प्रयत्न करत होते. तर, काही साचलेल्या पाण्यात घरामध्येच अडकून पडले होते. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीडीआरएफचे पथक मदतीसाठी दाखल झाल्यानंतर येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. येथील महिला आणि लहानग्यांना मानस सोसायटी येथील एका दुकानाचा गाळा निवारा म्हणून देण्यात आला. त्यानंतर भांजेवाडी भागातील पंप चालू करून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांना मदतीचा प्रयत्न सुरू केला होता. याशिवाय, मध्यरात्री नौपाड्यातील राममारूती रोडवरील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. रात्रीच्या सुमारास पाण्याची पातळी वाढल्याने हा परिसरही जलमय झाला होता. लोकमान्यनगर, सावरकरनगर, वृंदावन सोसायटी, वागळे इस्टेट, सहयोगमंदिर, राबोडी या भागातही अरुंद गल्ल्यांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सुरू होत्या. तर, ठाण्याच्या मध्यवर्ती भागाप्रमाणेच मुंब्रा, दिवा आणि शिळ परिसरातही पावसाचा जोर मोठा होता. मध्यरात्री रस्त्यावर पाण्याचा मोठा जलप्रवाह वेगाने वाहत असल्याने परिसर नागरिकांसाठी धोकादायक बनला होता. दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाची संरक्षण भिंत आणि तेथील झाड कोसळल्याने त्या जवळ उभ्या असलेल्या महापालिकेच्या तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये एक रुग्णवाहिका आणि इतर दोन महापालिकेची वाहने होती. तर, कळवा पूर्वेकडे खारेगांव रेल्वे फाटकाजवळ आनंद विहार कॉम्प्लेक्सची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. चेंदणी कोळीवाडा येथील दर्गा येथील संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. ठाण्यातील हिल व्ह्यू सोसायटी परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली. वागळे इस्टेट, बस डेपो, मनोरुग्णालय परिसर आणि ढोकाळी येथे फांद्या कोसळल्याची घटना घडली.

रेल्वे प्रवाशांना पाऊसफटका

मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडल्याने सकाळपासूनच मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे ठाणेपल्याडच्या रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी सुरू झाली होती. ठाणे-कल्याण दरम्यान धीम्यागतीने वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली होती. रविवार असल्याने प्रवाशांची वर्दळ कमी असली तरी मुंबईकडील प्रवास बराच काळ बंद असल्याने प्रवाशांनी पुन्हा परतीचा निर्णय घेतला. दुपारनंतर रेल्वेसेवा सुरळीत झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *