तौक्ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई

डहाणू तालुक्यातील पूर्व भागात सूर्या धरणाच्या पाण्यावर उन्हाळी भात शेती केली जाते. हे भातपीक काढणीच्या काळात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या वाऱ्या-पावसाने भातपिकाचे नुकसान केले. तर, पश्चिम भागात चिकू आणि आंबा बागायती, मिरची व भाजीपाला पिकांची लागवड आहे. मे महिन्याच्या अखेरीस येथील आंबा हंगाम असतो, ऐन हंगामात वाऱ्यामुळे फळे जमिनीवर पडली. चिकूलाही फळगळतीचा सामना करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले होते. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ भरपाईची मागणी केली होती.

सरकारने पंचनामे करण्याचे आदेश काढले. वादळीवारे, चिखल आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांनी बांधावर जाऊन पंचनामे करून संयुक्तरीत्या अहवाल राज्यस्तरावर पाठवला होता. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्र सरकारने विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुवार्षिक फळपिकासाठी प्रति हेक्टर ५० हजार रुपये (दोन हेक्टर मर्यादा), तर भाजीपाला व वार्षिक पिकासाठी प्रति हेक्टर १३ हजार ५०० रुपये (दोन हेक्टर मर्यादा) मदत जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *